दुर्देवी ! यवतमाळमध्ये संपूर्ण कुटुंबावर काळाचा घाला, वीज पडून 6 जणांचा मृत्यू

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – राळागाव तालुक्यातील गुजरी नागठाण शिवारात रविवारी सायंकाळी वीजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी नागठाणा येथील गोंडे यांच्या शेतातील एका घरावर वीज कोसळली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन दांपत्यांचा समावेश आहे. ही घटना आज सकाळी अरुण गोंडे यांच्या शेतात उघडकीस आली.

अभिमान आंबाघरे (वय-60), मंदाबाई अभिमान आंबाघरे (वय-50) आणि साहेबराव देवतळे (वय-45) व पीसबाई साहेबराव देवतळे (वय-40) अशी मृत्यू झालेल्या दोन दांपत्यांची नावे आहेत. याशिवाय लक्ष्मण बापूराव कोहळे (वय-50) आणि सुभाष राजू नेहारे (वय-20) यांचा देखील यामध्ये मृत्यू झाला. आंबाघरे, कोहळे आणि नेहारे हे यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील निमगव्हाण येथील रहिवाशी आहेत. तर देवतळे हे कोडपाखिंडी येथील रहिवाशी आहेत.

मृत सर्वजण गुजरी शिवारातील अरुण गोंडे यांच्या शेतात गायी चरण्यासाठी मागील काही दिवसापासून शेतातील शेडमध्ये मुक्कामी होते. काल संध्याकाळी राळेगाव तसेच परिसरात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. यावेळी शेडवर वीज कोसळल्याने शेडमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून परिसरात शोककळा पसरली आहे.