टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर जोशात आले कोच रवी शास्त्री, म्हणाले – ‘खड्डयात गेलं…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रांची येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 1 डाव आणि 202 धावांनी विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. कालच्या 8 बाद 132 धावसंख्येवरून पुढे खेळताना आफ्रिकेचे फलंदाज केवळ 12 चेंडूंचा सामना करू शकले. या विजयासह भारतीय संघाने आफ्रिकेचा 3-0 असा धुव्वा उडवत मालिका विजय साजरा केला. तिसरा सामना जिंकून आफ्रिकेला व्हाइट वॉश दिला. त्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे खूप खुश असून या आनंदात त्यांनी एक विधान केले आहे.

खड्ड्यात गेली खेळपट्टी
सामना संपल्यानंतर बोलताना रवी शास्त्री म्हणाले कि, कोणत्याही खेळपट्टीवर जिंकणारा संघ त्यांना हवा आहे. त्यांनी म्हटले कि, खेळामध्ये आम्ही खेळपट्टीचा विचारच केला नाही. ‘खड्ड्यात गेली खेळपट्टी’. जगातील कोणत्याही मैदानावर आम्हाला केवळ जिंकायचे आहे. आम्हाला केवळ 20 विकेट घ्यायच्या आहेत. आमचे फलंदाज उत्तम कामगिरी करत आहेत. त्यामुळे आमचे गोलंदाज केवळ विकेट घेण्यासाठी प्रयत्न करत असतात.

रोहित शर्मा याने बदलली शैली
रवी शास्त्री यांनी यावेळी रोहित शर्मा याचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी म्हटले कि, सुरुवातीला दोन तास शांतपणे फलंदाजी करण्याचा रोहित शर्मा याला फायदा मिळाला. रोहित शर्मा याने आपली खेळण्याची शैली बदलली असून त्याने मानसिकता देखील बदलली आहे. सुरवातीला शांत फलंदाजी केल्यानंतर तो दादा होतो. या कसोटी मालिकेत रोहित शर्मा याने तीन सामन्यांत 529 धावा केल्या. यामध्ये त्याने तीन शतके आणि 1 अर्धशतक झळकावले. दोन डावांत तर भारतीय संघाला फलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही.

नदीमपासून झाले प्रभावित
नदीम विषयी बोलताना शास्त्री म्हणाले कि, मी त्याच्यापासून फार प्रभावित झालो असून त्याने शानदार सुरुवात केली आहे. या सामन्यात नदीमने सुरुवातीची तीन षटके हि निर्धाव टाकली होती.

Visit : Policenama.com