भाजपाचा उध्दव ठाकरेंना जबरदस्त ‘टोला’, तुम्ही भले ‘वचन’…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटताना दिसून येत नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंब्याचे पत्र न दिल्याने शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. त्यानंतर आता भाजपने शिवसेनेवर टीका केली असून भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी शिवसेनेवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. यावेळी ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि, तुम्ही भलेही वचन दिले असेल मात्र शरदराव व सोनियांनी थोडचं वचन दिलं आहे अशा शब्दांत त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मी बाळासाहेबांना शब्द दिल्याचे म्हटले होते, त्यावरून वाघ यांनी हा टोला मारला आहे.

काल दुपारपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शिवसेना सहज सरकार स्थपन करणार असे वाटत असताना संध्याकाळपर्यंत हे चित्र स्पष्ट होत नव्हते. शिवसेनेला संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत सत्तास्थापनेची मुदत देण्यात आली होती, मात्र या वेळेत शिवसेना बहुमताचा आकडा जमा करू शकली नाही. त्यानंतर आता राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. त्यानंतर त्यांनी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर केलेल्या टीकेची देखील त्यांनी आठवण करून दिली. त्यामुळे आता भाजप शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

वाघ यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रावर देखील टीका केली असून सामना हे सर्वधर्म समभावाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक असे यामध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर दुसऱ्या ट्विटमध्ये सामनातून अजित पवार यांच्यावर टीका केल्याचे फोटो देखील त्यांनी टाकले आहेत. तसेच एक व्यंगचित्र देखील अपलोड केले आहे.

दरम्यान, शिवसेनेने राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दोन दिवसांची मुदत मागितली होती. मात्र राज्यपालांनी ती फेटाळली. मात्र सध्या शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणितांमध्ये अडकून पडली आहे. त्यामुळे आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे शिवसेनेचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com