जिल्ह्यात प्रस्थापितांचे बुरूज ढासळले, महायुतीला महाआघाडीने दिला धक्का, 8 जागांवर आघाडी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – बारा-शून्य अशी वल्गना करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर भाजप नेत्यांना मोठा धक्का जिल्ह्यातील जनतेने दिला आहे. अनेक प्रस्थापितांचे बुरूज ढासळले असून, महाआघाडीने महायुतीला मोठा धक्का दिला आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच जण विजयी झाले, तर एक जण आघाडीवर आहे. काँग्रेस पक्षाचे दोन जण विजयी झाले. भारतीय जनता पक्षाचे दोन जण विजयी झाले. नेवाशातून शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे शंकरराव गडाख हे विजयी झाले. शेतकरी क्रांतिकारी पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसने बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निकालामुळे अनेक नेत्यांचे अंदाज चुकले आहेत.

राज्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी मंत्री राम शिंदे यांना यांचा तब्बल 42 हजार मतांनी पराभव केला. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीच्या प्रताप ढाकणे यांचा 14 हजार 214 मतांनी पराभव केला. पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांचा तब्बल 60 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. संगमनेर मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे बाळासाहेब थोरात हे 62 हजार यांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात गेलेल्या आमदार वैभव पिचड यांना अकोले येथील जनतेने नाकारून किरण लहामटे यांना 57 हजार 688 मताधिक्क्याने विजयी केले.

नगर शहरातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा 10 हजार 940 मतांनी पराभव केला. शिर्डी मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील ही 69 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांनी शिवसेनेत गेलेले आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा 17 हजार 972 मतांनी पराभव केला. नेवासा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी कामगार पक्षाचे शंकराव गडाख यांनी भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचाही मोठ्या फरकाने पराभव केला.

राहुरी मतदार संघातून भाजपचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांच्या विरूद्ध प्राजक्त तनपुरे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे आशुतोष काळे भाजपच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यापेक्षा सतराशे मतांनी आघाडीवर आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात रस्सीखेच चालू आहे. अतिशय कमी मतांच्या फरकाने राष्ट्रवादी उमेदवार घनश्याम शेलार व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यात ‘काँटे की टक्कर’ सुरू आहे.

Visit : Policenama.com