ठाकरे सरकार पहिल्या परिक्षेत मेरिटमध्ये पास, विधिमंडळात केलं बहुमत सिध्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील गेल्या महिन्याभरापासुन राजकीय हलचालींना वेग आलेला आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर विधिमंडळात बहुमत सिध्द करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर होतं. महाविकास आघाडीनं त्यांचं बहुमत सिध्द केलं आहे. मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विधानसभा विश्वास व्यक्त करत आहे असा प्रस्ताव काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी सर्वप्रथम मांडला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि जयंत पाटील यांनी देखील तोच प्रस्ताव मांडला त्याला शिवसेनेच्या सुनिल प्रभु यांनी अनुमोदन दिलं. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी आवाजी मतदान घेतलं आणि हेडकाऊंट केला.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने त्यांच्या सर्व आमदारांना व्हीप बजावला होता. त्यामुळे बहुमत चाचणीत कोणीही आमदार पक्षाच्या आदेशाला डावलणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. भाजपानं वेळावेळी महाविकास आघाडीवर टीका केली. महाविकासचे एकुण 162 आमदार आहेत. मात्र, त्यांना काही छोटया पक्षांनी तसेच अपक्ष आमदारांनी देखील पाठिंबा दिला असल्याचं सांगितलं जात होतो. महाविकासच्या ज्येष्ठ नेत्यांकडून 170 आमदारांचा महाविकासला पाठिंबा असल्याचा दावा करण्यात येत होता.

शेवटी आज विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी महाविकासला बहुमत सिध्द करताना 169 आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं मत नोंदवलं तर भाजपाच्या आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या विरूध्द मत नोंदवलं. ज्यांना प्रस्तावाच्या बाजुनं जायचं आहे त्यांनी उजव्या बाजूला बसा, ज्यांना प्रस्तावाविरूध्द जायचं आहे त्यांनी डाव्या बाजुला बसण्याचे आदेश दिलीप वळसे-पाटील यांनी दिले. तटस्थ राहणार्‍यांना समोर बसण्यास सांगितले.

4 आमदार तटस्थ राहिले असून त्यामध्ये एमआयएम आणि सीपीएमच्या आमदारांचा समावेश आहे.

Visit : Policenama.com