‘देशात अराजक माजलंय !’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याची शंका व्यक्त केली आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत जे काही झालं तसंच ज्या पद्धतीची वक्तव्यं जिल्हा दंडाधिकारी आणि इतर करत आहेत त्यावरून उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत आहे हे सिद्ध होत आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मंत्रालयासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “देशात अराजक माजलं असून उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत जे घडलं त्याबद्दल योगी आदित्यनाथ सरकारनं स्वत:ची चूक कबुल करावी. उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य राहिलं नसल्यानं योगींनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “2 दिवसात उत्तर प्रदेशात बलात्काराच्या 3 घटना समोर आल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री काहीही बोलण्यास तयार नाहीत. यासंबंधित सविस्तर चौकशी व्हावी अशी विनंती मी पंतप्रधानांना करते. राज्यातील महिलांची सुरक्षा करण्यास असमर्थ असेल तर योगी सरकारनं राजीनामा दिला पाहिजे.”