275 दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात, LOC वर सक्रिय झाले 7 ‘लॉन्च पॅड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीरच्या मुद्द्यावर सर्वच ठिकाणी अपमानित झालेल्या पाकिस्तानने आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. पाकिस्तान सैन्य आणि आयएसआयच्या मदतीने काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर दहशतवादी तळ पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच 7 लाँचपॅड तयार करण्यात आले असून 275 दहशतवादी सक्रीय झाले आहेत. इतकेच नाही, तर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अफगाण आणि पश्तून शिपायांना देखील नियंत्रण रेषेजवळ तैनात करण्यात आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

1990 मध्ये पाकिस्तानने सर्वात आधी जिहादींचा वापर सीमेपार भारताविरोधात दहशतवाद पसरवण्यासाठी केला होता. भारताविरोधात काश्मीर खोऱ्यात प्रॉक्सी युद्ध छेडण्यासाठीच पाकिस्तानने हा प्रयत्न केला होता. भारताने याला प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानने आपल्या रणनीतीत बदल केला.

भारतीय लष्कराच्या सूत्रांनी माहिती देताना सांगितले आहे की पाकिस्तानी सैनिकांना बॅरेकमधून बाहेर काढून एलओसीच्या 30 किलोमीटरच्या परिसरात तैनात केले आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानच्या या हालचालींवर बारीक नजर ठेवून आहे. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी स्थानिक आणि अफगाणिस्तान मोठ्या प्रमाणात भरती करण्यास सुरवात केली आहे, तेव्हा पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे.