शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जाण्यापुर्वी ‘हे’ नक्की वाचा, जाणून घ्या

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – राज्य सरकारने उद्यापासून ( दिवाळी पाडव्याला) शिर्डीतील श्री साईमंदिर उघडण्याचा निर्णय घेत जगभरातील भाविकांना दिवाळीची अनोखी भेट (diwali-padva-sai-mandir-will-be-open) दिली आहे.तब्बल आठ महिन्यांनी भाविकांसाठी साई मंदिर उघडले जाणार आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात एकाचवेळी दर्शनासाठी गर्दी होऊ नये, यासाठी नियोजन सुरू असून त्यासाठी आज शिर्डीत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा होत आहे.

राज्यामध्ये करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले. त्यासोबतच सर्व प्रार्थनास्थळे बंद केली होती. आता राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे पाडव्यापासून उघडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल याबाबतची घोषणा केली. उद्या, पाडव्याच्या मुहूर्तावर साईमंदिर उघडल्यानंतर प्राधान्याने शिर्डी येथील ग्रामस्थांना टप्याटप्याने दर्शन देण्यात येणार आहे. मात्र, यावेळी गर्दी होऊ नये, यासाठी दर्शनासाठी टोकन दिले जाणार आहे. तर, शिर्डीबाहेरील भाविकांना ऑनलाइन पद्धतीने पास काढून दर्शनासाठी यावे लागणार आहे. दहा वर्षाच्या आतील मुले व 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना दर्शनाची परवानगी नाकारली आहे. दर्शन रांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांना समाधी व द्वारकामाई मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे.

साई भक्तांना त्यांची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी जी संधी मिळाली आहे, त्यासाठी शिर्डी येथील ग्रामस्थांनी सुद्धा सहकार्य करावे. टोकन घेऊन दर्शनासाठी आपल्याला दिलेल्या वेळेत यावे. जो भाविक त्याला दिलेल्या वेळेच्या नंतर येईल त्याला मदत करणे अवघड जाईल. तसेच शिर्डी येथील ग्रामस्थांनी आपले मतदान कार्ड येताना सोबत ठेवावे. शिर्डीबाहेरील नागरिकांनी ऑनलाइन दर्शनाचा पास घ्यावा.कान्हुराज बगाटे, सीईओ, शिर्डी संस्थान.

अर्थकारणाची घडी येणार रुळावर
शिर्डी येथे श्रीसाई बाबांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येत असतात. मात्र,17 मार्चपासून मंदिर बंद असल्यामुळे येथील अर्थकारणाची घडी संपूर्ण विस्कटली होती. छोटमोठ्या व्यवसायावर अवलंबुन असणाऱ्या अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. मंदिर उघडण्यास केव्हा परवानगी मिळेल, याकडे भाविकांसह या भागातील नागरिकांचे लक्ष लागले होते. आता पाडव्यापासून मंदिर उघडण्यात येणार असल्यामुळे येथील अर्थकारणाची घडी रुळावर येण्यास हळूहळू मदत होणार आहे.