‘राम मंदिरात मोदींचं काहीही योगदान नाही’, सुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या निर्णयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काहीही योगदान नाही. सरकारमध्ये असताना त्यांनी यासंदर्भात कोणतंही काम केलेलं नाही असं सांगत भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराच्या प्रश्नावरून मोदींवर निशाणा साधला. विशेष म्हणजे त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना याचं श्रेय दिलं आहे.

एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना स्वामींनी धक्कादायक विधान केलं आहे. ते म्हणाले, “पंतप्रधानांचं यामध्ये कोणतंही योगदान नाही. राम मंदिर प्रकरणात सर्व चर्चा आम्ही लोकांनी केली आहे. सरकारच्या वतीनं त्यांनी असं कोणतंही काम केलेलं नाही जे मला माहिती आहे किंवा ज्यामुळं म्हणू शकतो की, निर्णय आला. मुळात ज्यांनी यात काम केलं आहे त्यांचं नाव मी घेतलं आहे. यात पहिलं नाव राजीव गांधी यांचं आहे” असं स्वामी म्हणाले.

भाजपचे आमदार तेजिंदर सिंह बग्गा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे. ही मुलाखत कधीची आहे याबाबत त्यांनी काहीही उल्लेख केलेला नाही मात्र मुलाखतीवरून बग्गा यांनी सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी लिहलं की, “गिरगिट स्वामी म्हणत आहेत की, पंतप्रधान मोदी यांचं राम मंदिर उभारणीत कोणतंही योगदान नाही आणि राजीव गांधींना याचं श्रेय देत आहे.” अशी टीका बग्गा यांनी केलीय.